Pune Crime News | सोशल मीडियावर वाढत चाललेली मैत्री अनेकदा किती धोकादायक ठरू शकते, याचं धक्कादायक उदाहरण कोल्हापुरातून समोर आलं आहे. इन्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाच्या आमिषाला बळी पडून पुण्यातील 19 वर्षांची तरुणी घर सोडून कोल्हापुरात आली होती. मात्र, प्रत्यक्ष भेटीच्या बहाण्याने बोलावलेल्या तरुणाने तिला अक्षरशः चार दिवस फसवून एकटीच सोडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखींबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रेमात पडल्यावर कोणताही विचार न करता घेतलेले निर्णय किती महागात पडू शकतात, याचं हे जिवंत उदाहरण आहे. संबंधित तरुणी पुण्यातील असून सोशल मीडियावर तिची कोल्हापुरातील एका तरुणाशी मैत्री झाली होती. या मैत्रीतूनच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि भेटीचं ठरलं. मात्र, ही भेट तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण अनुभव ठरेल, याची तिला कल्पनाही नव्हती.
भेटीच्या बहाण्याने कोल्हापुरात बोलावलं, मोबाईल आणि पैसेही नव्हते :
30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोल्हापुरातील पाटील गल्ली परिसरात एका बाकड्यावर 19 वर्षांची तरुणी रडत बसलेली दिसली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. विचारपूस केली असता तिच्या आयुष्यात घडलेली भयावह कहाणी उघड झाली. सोशल मीडियावरील मित्राने तिला कसबा बावडा परिसरात भेटायला बोलावलं होतं, मात्र तो प्रत्यक्षात तिथे आलाच नाही.
या तरुणीकडे ना स्वतःचा मोबाईल होता, ना प्रवासासाठी पुरेसे पैसे. संबंधित तरुणाने तीन ते चार दिवस तिला कोल्हापुरातील विविध भागात फिरवत ठेवलं. प्रत्येक वेळी नवं ठिकाण सांगून भेटीचं आमिष दाखवलं, मात्र शेवटी दिलेला पत्ता देखील खोटा निघाला. अखेर पूर्णतः फसवणूक झाल्याची जाणीव होताच ती तरुणी मानसिकदृष्ट्या खचून गेली आणि रस्त्यावरच रडत बसली.
Pune Crime News | आईशी संपर्क, पुण्यात आधीच बेपत्ता तक्रार :
तरुणी रडत असल्याचं पाहून काही सुजाण तरुणांनी तिची मदत केली. सुरुवातीला ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हती, मात्र विश्वास दिल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील तिच्या आईशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा पुण्यात आधीच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं समोर आलं. (Instagram fraud case)
आपली मुलगी कोल्हापुरात सुरक्षित असल्याचं कळताच आईला अश्रू अनावर झाले. त्यांनी स्थानिक तरुणांना मुलगी त्यांच्या ताब्यात येईपर्यंत सुरक्षित ठेवण्याची विनंती केली. पोलिसांनीही या प्रकरणाची नोंद घेतली असून, सोशल मीडियावरून फसवणूक करणाऱ्या संबंधित तरुणाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे तरुणांनी सोशल मीडियावरील ओळखींबाबत अधिक सावध राहण्याचं आवाहन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.






