Pradnya Satav Resigns | काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (18 डिसेंबर) काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे अधिकृतपणे सादर केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.
आजच प्रज्ञा सातव (Pradnya Satav Resigns) यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि वाढत्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत सध्या कोणतेही ठोस तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
समर्थकांची जोरदार घोषणाबाजी, हिंगोलीतून मोठी उपस्थिती :
प्रज्ञा सातव या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी समर्थकांसह आल्या होत्या. हिंगोलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘राजीव सातव अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रज्ञा सातव यांच्यासोबत आलेले अनेक कार्यकर्ते भाजप कार्यालयातही दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
स्वर्गीय राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती.
Pradnya Satav Resigns | कोण आहेत प्रज्ञा सातव? :
डॉ. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. 2021 मध्ये काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, आज दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील प्रवास थांबला आहे. (Pradnya Satav Resigns)
राजीव सातव हे काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे नेते होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.






