Onion Price | महाराष्ट्र हे देशातील कांदा उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य मानले जाते. नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव यांसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्टा म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यातील शेतकरी कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. (Onion Rate Today)
दरम्यान, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने कांदा आयातीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय कांद्याच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
बांगलादेशचा मोठा निर्णय, निर्यातीला वेग :
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश सरकारने कांदा आयातीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांची संख्या वाढवली आहे. याआधी कांदा आयातीसाठी 50 परवाने दिले जात होते, मात्र आता ही संख्या थेट 200 करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशला जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला मोठा वेग येणार आहे.
अलीकडेच बांगलादेशने भारतातून कांदा आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सुमारे 1500 टन कांदा भारतातून बांगलादेशात पोहोचला होता. आता आयात परवान्यांची संख्या वाढल्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात भारतीय कांदा बांगलादेशात निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Onion News)
कांदा बाजारभावात तेजी येण्याची शक्यता :
या निर्णयाचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत कांदा बाजारावर दिसून येण्याची अपेक्षा आहे. निर्यात वाढल्यामुळे बाजारातील कांद्याचा पुरवठा कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम भाववाढीच्या स्वरूपात दिसून येऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस कांद्याचे बाजारभाव वाढत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी बांगलादेश सरकारने स्थानिक बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 7 डिसेंबरपासून कांदा आयातीवर काही निर्बंध घातले होते. मात्र सध्या तेथील बाजारात कांद्याची मागणी वाढली असून उपलब्धता कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा आयात परवान्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, निर्यातदारांनाही फायदा :
बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाने बाजारात स्थिरता येईपर्यंत आणि पुढील आदेश येईपर्यंत भारतातून कांदा आयात सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कांदा निर्यातीमध्ये सातत्य राहण्याची शक्यता आहे.
याचा थेट फायदा कांदा निर्यातदारांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या बाजारभाव दबावाखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरणार असून, पुढील काही दिवस तरी कांद्याला अपेक्षित दर मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.






