Maharashtra politics | अजित पवार यांच्या निधनाला अवघे तीन दिवस होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यासोबतच पक्षाची कमान त्यांच्या हाती देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने अनेकांकडून टीका होत आहे. “अजून दहावंही झालेलं नाही, मग इतकी घाई कशाला?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Maharashtra politics Breaking News)
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील (Anil Patil) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “अजित पवार यांचं जाणं हे न भरून निघणारं दु:ख आहे. ही पोकळी कधीही भरून येणार नाही. पण त्याचवेळी पक्षाचे कार्यकर्ते सैरावैरा झाले आहेत,” असं सांगत त्यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट केलं.
कार्यकर्ते आणि निवडणुकांची गरज :
अनिल पाटील (Anil Patil) म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार यांनी आधीच उमेदवारी दिली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते दिशाहीन झाले होते. “गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक नेत्याची भावना होती की, सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
“घाई झाली असं अनेकांना वाटत असलं तरी जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे संघटन मजबूत ठेवणं आवश्यक आहे. जी घटना घडली ती न भरून निघणारी आहे, पण पक्ष संघटीत ठेवण्यासाठी हा निर्णय काळाची गरज आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
Maharashtra politics | शरद पवारांच्या वक्तव्यावर उत्तर :
सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्या शपथविधीबाबत मला कल्पना नव्हती, असं शरद पवार (Sharad pawar) यांनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावर अनिल पाटील म्हणाले, “त्यांना कल्पना दिलेली असेल किंवा नसेल, या विषयावर आता काही बोलण्यात अर्थ नाही. यावर चर्चा करण्यात काही उपयोग नाही.”
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या निवडीसाठी होत असलेल्या घाईवर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत बोलताना अनिल पाटील म्हणाले की, “तीन दिवसांचा दुखवटा पूर्ण झाला असला तरी अजून दहावं झालेलं नाही, हे खरं आहे. पण नेता निवडणं ही काळाची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या भावना नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय.”






