Nawab Malik | राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं असून निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कुटुंबाबाबत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत नवाब मलिकांच्या कुटुंबातील तब्बल तीन सदस्य राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत. एकाच कुटुंबातील तीन जण रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Nawab Malik)
कोण-कोण लढवणार निवडणूक? :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळालेल्या नवाब मलिक कुटुंबातील उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
कप्तान मलिक (नवाब मलिक यांचे भाऊ) – प्रभाग क्रमांक १६५
डॉ. सईदा खान (नवाब मलिक यांची बहीण) – प्रभाग क्रमांक १६८
बुशरा नदीम मलिक (कप्तान मलिक यांची सून) – प्रभाग क्रमांक १७०
प्रभाग क्रमांक १७० हा महिला राखीव असल्याने कप्तान मलिक यांनी त्या जागेवर स्वतः न लढता आपल्या सुनेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मलिक कुटुंबातील तिघे वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Nawab Malik | राजकीय चर्चांना उधाण :
एकाच कुटुंबातील तीन सदस्य महापालिका निवडणूक लढवत असल्याने विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही रणनीती मुंबईतील काही प्रभागांमध्ये ताकद वाढवणारी ठरू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. (Nawab Malik)
दरम्यान, राज्यातील इतर महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट युतीच्या चर्चा सुरू असल्या तरी मुंबई महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईत 35 उमेदवारांची यादी फायनल :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबई महानगरपालिकेसाठी ३५ उमेदवारांची यादी अंतिम केली असून, सर्व उमेदवारांना आज एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईतील प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक कुटुंबाचा हा राजकीय डाव कितपत यशस्वी ठरतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.






