Nanded-Mumbai Vande Bharat | मराठवाड्याच्या दळणवळणात ऐतिहासिक बदल घडवत नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी ही गाडी जालना-मुंबई दरम्यान धावत होती. आता ती थेट हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे.
या गाडीच्या शुभारंभामुळे नांदेड ते मुंबई हे अंतर केवळ 9 तास 30 मिनिटांत पूर्ण होणार असून, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही सेवा सोयीस्कर, आरामदायी आणि वेगवान ठरणार आहे.
वेळापत्रक आणि सुविधा :
नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेस दररोज (गुरुवार वगळता) सकाळी 5 वाजता सुटेल आणि दुपारी 2.30 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. तर मुंबईहून ही गाडी दुपारी 1 वाजता सुटेल आणि रात्री 10.50 वाजता नांदेडला पोहोचेल.
गाडीमध्ये 20 डबे असून तब्बल 1440 प्रवाशांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, एसी कोचेस, आरामदायी आसनव्यवस्था आणि आकर्षक डिझाइनमुळे प्रवाशांना प्रगत देशांसारखा सुखकर अनुभव मिळणार आहे.
Nanded-Mumbai Vande Bharat | तिकीट दर आणि बुकिंग
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारचं तिकीट 1610 रुपये असून जेवण न घेतल्यास ते 1246 रुपये असेल. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कार तिकीट 2930 रुपये असून जेवण न घेतल्यास ते 2511 रुपये होईल. (Nanded-Mumbai Vande Bharat)
मुंबई-नांदेड प्रवासासाठी एसी चेअर कारचं तिकीट 1775 रुपये असून जेवण न घेतल्यास ते 1240 रुपये राहील. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचं तिकीट 3125 रुपये असून जेवण वजा केल्यास ते 2512 रुपये असेल. तिकीट बुकिंगची सुविधा 27 आणि 28 ऑगस्टपासून सुरू झाली आहे.






