MHADA Lottery 2026 | मुंबई आणि पुणे परिसरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाकडून मार्च महिन्यात बहुप्रतिक्षित घरांची सोडत जाहीर करण्यात येणार असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सुमारे ४ हजार परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. निवडणूक, आचारसंहिता आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली ही प्रक्रिया आता प्रत्यक्षात येणार असल्याने घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून या सोडतीसाठी तयारीला वेग देण्यात आला असून अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी आणि कागदपत्र तपासणी याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या सोडतीत मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय नागरिकांसाठी घरांचे दर निश्चित करण्यात येणार असून, आर्थिक क्षमतेनुसार परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. (MHADA Pune houses)
मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश :
या सोडतीत मुंबईतील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर, जी.टी.बी. नगरमधील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर तसेच अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर या महत्त्वाच्या प्रकल्पांमधील घरांचा समावेश होण्याची शक्यता आहे. हे सर्व प्रकल्प सध्या नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर असून, त्यातील काही घरांची उपलब्धता या सोडतीत दिली जाऊ शकते. (MHADA Lottery 2026)
मुंबईसह पुणे परिसरातील नागरिकांनाही या सोडतीचा मोठा लाभ होणार असून, उपनगरांमध्ये तसेच विकसित होत असलेल्या भागांमध्ये परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. त्यामुळे घराच्या शोधात असलेल्या अनेक कुटुंबांसाठी ही सोडत महत्त्वाची ठरणार आहे.
MHADA Lottery 2026 | पायाभूत सुविधांवर म्हाडाचा भर :
म्हाडाने गेल्या सुमारे ७६ वर्षांत सर्वसामान्य नागरिकांसाठी जवळपास ९ लाख परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, मागील काही सोडतींमध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे काही प्रकल्पांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने आता पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. (MHADA Lottery 2026 News)
काही प्रकल्पांमध्ये घरांच्या किमतीही कमी करण्यात आल्याची माहिती असून, त्यामुळे आगामी सोडतीत विशेषतः कोकण मंडळाच्या घरांना किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, मार्च महिन्यातील ही म्हाडा सोडत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी आशेचा नवा किरण ठरणार असून, मुंबई आणि पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरण्याची शक्यता आहे.






