Manoj Jarange Delhi March | मुंबईत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर मराठा आरक्षण चळवळीला आता दिल्ली गाठण्याची दिशा मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मोठी घोषणा करत “चलो दिल्ली”चा नारा दिला आहे. यामुळे मराठा समाजाचे वादळ आता राज्याच्या सीमांच्या बाहेर जाऊन देशाच्या राजधानीत धडकणार आहे.
मुंबई आंदोलनाचं यश आणि सरकारचा निर्णय :
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या उपोषण आणि आंदोलनादरम्यान लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. या तीव्र आंदोलनानंतर सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला. त्यामुळे मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे. यानंतर लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. (Manoj Jarange Delhi March)
धाराशिव येथे झालेल्या बैठकीदरम्यान जरांगे पाटलांनी जाहीर केले की, मराठा समाजाचं मोठं अधिवेशन दिल्लीमध्ये होणार आहे. लवकरच याची तारीखही जाहीर केली जाणार असून देशभरातील मराठा समाज या अधिवेशनात एकत्र येणार आहे. राज्यातील यशानंतर आता राष्ट्रीय स्तरावर ताकद दाखवण्याची ही रणनीती असल्याचं मानलं जात आहे.
Manoj Jarange Delhi March | ओबीसींचा विरोध आणि नव्या समीकरणांची चिन्हं :
दरम्यान, सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करताच ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “मराठ्यांना आमच्यामधून आरक्षण नको” अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
त्याचबरोबर बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आक्रमक झाले असून, “आमचा एसटीमध्ये समावेश करावा” अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






