Pune Police Transfer | पुणे शहर पोलीस दलात गुरुवारी मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल 32 कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आल्याने संपूर्ण दलात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar Pune Police) यांनी ही कारवाई करत शिस्तीचा कडक संदेश दिला आहे.
गेल्या काही दिवसांत परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी हालचाल झाल्याची चर्चा आहे. चोरी, लूट, कोयता गँगचा धुमाकूळ आणि बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे ही केवळ नियमित बदली नसून शिस्तभंगावर आधारित ठोस पाऊल असल्याचे म्हणणे आहे.
नेमकी कारवाई काय? :
आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशानुसार 3 सहाय्यक पोलीस फौजदार (ASI), 10 पोलीस हवालदार (HC) आणि 19 पोलीस अंमलदार (PC) अशा एकूण 32 जणांची तातडीने बदली करण्यात आली. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रामुख्याने लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station) येथून इतर पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. काहींना पुणे विमानतळ तर काहींना सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे. (Pune Police Transfer)
अधिकृत आदेशात कारण ‘प्रशासकीय’ असे नमूद असले तरी ही शिक्षात्मक कारवाई असल्याची चर्चा रंगली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गोपनीय अहवालात संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच काही कर्मचारी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही विविध वशिल्यांच्या जोरावर त्याच ठिकाणी कार्यरत होते, अशी माहिती समोर आली आहे.
Pune Police Transfer | स्थानिक हितसंबंध आणि वाढती गुन्हेगारी कारणीभूत? :
काही कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच वास्तव्यास असल्याने स्थानिक गुन्हेगार व अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांशी त्यांचे संबंध निर्माण झाल्याच्या तक्रारी होत्या. लोणी काळभोर परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवण्यात अपयश आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मोठा निर्णय घेतल्याचे मानले जाते. (Pune Police Transfer News)
आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले आहे. या मास ट्रान्सफरमुळे शहरातील इतर पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली असून शिस्तभंग किंवा अकार्यक्षमता सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. एकाच वेळी 32 जणांची बदली होणे म्हणजे संबंधित पोलीस ठाण्याचे जवळपास अर्धे मनुष्यबळ बदलल्यासारखेच चित्र निर्माण झाले आहे.






