Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रातील तापमानात झपाट्याने घट होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा थेट 6 अंशाखाली गेला आहे. सकाळच्या वेळेत दाट धुके पडत असून गारठ्याचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी मोठा अलर्ट जारी करत पुढील दोन दिवस कडाक्याच्या थंडीची लाट कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर भारतात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून नागरिकांना थंडीसह हुडहुडीचा सामना करावा लागत आहे.
देशातील इतर राज्यांत अद्याप पावसाचे ढग सक्रिय असल्याने केरळ, तामिळनाडू (tamilnadu Weather) आणि आंध्र प्रदेशच्या भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सून माघारी गेल्यानंतरही काही प्रदेशांमध्ये पावसाची स्थिती कायम असताना महाराष्ट्रात मात्र गारठा वाढल्याचे दृश्य दिसत आहे. महाबळेश्वरसह थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत असून सकाळ-संध्याकाळच्या गार वाऱ्यामुळे तापमान झपाट्याने खाली येत आहे. (Maharashtra Weather Alert)
मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात अलर्ट :
भारतीय हवामान विभागाने नुकताच इशारा देत राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही विभागाने सांगितले आहे. परभणीसह अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून तापमान 6 अंशाखाली असल्याने स्थानिकांना भीषण थंडीचा सामना करावा लागत आहे. (Maharashtra Cold Wave)
वारंवार तापमानात होणाऱ्या घसरणीमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळच्या शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाढत्या गारठ्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आरोग्याच्या समस्या असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका आणखी वाढेल, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
Maharashtra Weather Alert | किमान तापमानात विक्रमी घट; नागरिकांसाठी आरोग्याचा इशारा :
पंजाबच्या आदमपूर येथे सर्वात नीचांकी 3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात निफाडमध्ये 6.3 अंश तापमान नोंदवले गेले तर जळगाव, आहिल्यानगर, नाशिक, यवतमाळ, गोंदिया आणि पुणे येथे 9 अंशांपेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेल्याने राज्यात थंडीचा तडाखा जाणवत आहे.
सततच्या हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, खोकला, ताप आणि दमा यासारख्या समस्या वाढत आहेत. तज्ज्ञांनी उबदार कपडे वापरणे, गरम पाणी पिणे आणि सकाळच्या थंड हवेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस पाऱ्यात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.






