Weather Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. आज मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस आणि भूस्खलन :
मुंबईत गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अंधेरी, सांताक्रूझ, विक्रोळी, घाटकोपर, वरळी, सायन आणि दादर परिसरात 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक भागांत पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल ट्रेनसेवा आणि रस्ते वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. विक्रोळीतील वर्षा नगर भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना स्थानिक प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली असून बचाव कार्य सुरू आहे. (Maharashtra Weather Alert)
मुंबई आणि रायगडला रेड अलर्टसह संपूर्ण कोकणाला ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात 15 ते 20 ऑगस्टदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या कालावधीत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची तीव्रता वाढेल.
Weather Alert | उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज :
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)
प्रशासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी थांबावे आणि पावसाच्या इशाऱ्यांनुसार आपली कामे नियोजित करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.






