Maharashtra weather update | फेब्रुवारी अर्धा संपत असतानाच राज्यात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. हवामान विभागाने १६ फेब्रुवारीसाठी दिलेल्या अंदाजानुसार कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात उष्ण व दमट वातावरणाचा प्रभाव तीव्र राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात कस असणार हवामान :
हवामान खात्याने (India Meteorological Department – IMD) जाहीर केलेल्या माहितीनुसार, रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबतच दमटपणाही वाढेल. या बदलामुळे नागरिकांना अंगाची लाहीलाही होणे, घाम जास्त येणे आणि अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण कोकण पट्ट्यात तापमान नेहमीपेक्षा अधिक राहू शकते.
पुढील ४८ तासांत कोकणातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसची वाढ अपेक्षित आहे. काही भागांमध्ये तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जाऊ शकते. किनारी भागात उष्ण आणि दमट हवामान एकत्र आल्याने उकाड्याचा त्रास अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra weather update | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील चित्र :
कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात हवामान मुख्यतः कोरडे आणि स्वच्छ राहील. सकाळच्या वेळेत किंचित गारवा जाणवेल; मात्र दुपारनंतर सूर्यकिरणांची तीव्रता वाढल्याने उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवेल. पुढील २४ तासांत राज्यातील किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra weather update)
त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमान पुन्हा २ ते ३ अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. १६ फेब्रुवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. पुणे (Pune) शहर आणि परिसरात कमाल तापमान सुमारे ३३ अंश तर किमान १५ अंश सेल्सिअस राहील. पाषाणमध्ये ३३/१५, लोहेगावमध्ये ३४/१८, चिंचवडमध्ये ३२/१९, लवळेमध्ये ३३/१८, मगरपट्ट्यात ३३/२१, एनडीएमध्ये ३२/१३ आणि कोरेगाव पार्कमध्ये ३३/१८ अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






