Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणावर आज शोककळा पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. मुंबईहून बारामतीकडे (Baramati) प्रवासाला निघालेल्या विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला, ज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह इतरही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
विमान दुर्घटनेचा थरार :
मुंबईहून (Mumbai) निघालेले हे विमान बारामती येथील धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणाने कोसळले. या विमानात एकूण ६ जणांचा समावेश होता, त्यापैकी तीन व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर अजित पवार यांच्यासह उरलेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Ajit Pawar Breaking News)
या भीषण दुर्घटनेत विमानाचा चक्काचूर झाला असून, अपघातानंतर विमानाने पेट घेतल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या संस्थेने या अपघातात एकूण ६ जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यासाठी ते या विमानाने प्रवास करत होते.
Ajit Pawar | पवार कुटुंबाची सद्यस्थिती :
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर घटनास्थळी दाखल झाली. विमानाचे अवशेष विखुरलेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. पोलीस आणि इतर यंत्रणांनी परिसराचा ताबा घेतला असून तपास सुरू केला आहे.
या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) हे सर्वजण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी एकत्र जमले आहेत. संपूर्ण पवार कुटुंब सध्या धक्क्यात असून बारामतीसह संपूर्ण राज्यात तणावाचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.






