Heatwave l मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी (Ashreya Shetty) यांच्या माहितीनुसार, पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे १४ ते १८ फेब्रुवारी या काळात ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये तापमान वाढणार आहे.
फेब्रुवारीमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव :
हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि लगतच्या भागातील कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना देखील उन्हाळ्याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. गुरूवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
मुंबईच्या उपनगरांमध्ये तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ही यंदाच्या उन्हाळ्यातील पहिलीच उष्णतेची लाट असू शकते, असा अंदाज आहे. दिल्ली (Delhi) मध्ये देखील उष्णता जाणवेल.
विविध शहरांतील तापमानाची नोंद :
गुरूवारी, विविध शहरांमधील तापमानाची नोंद घेण्यात आली. यात प्रामुख्याने मुंबईमध्ये ३६ अंश, ठाणेमध्ये ३७.४ अंश, डोंबिवलीमध्ये ३८.३ अंश तापमान नोंदविण्यात आले.
अंबरनाथमध्ये ३८.३ अंश, नवी मुंबईमध्ये ३८.४ अंश, पनवेलमध्ये ३७.२ अंश, तर पालघरमध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.






