Kidnapping Case l वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावत मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. आरोपींना मालवणी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, मुलाच्या विक्रीसाठी हा कट रचण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दहा दिवसांपूर्वी घडले अपहरण प्रकरण :
2 मार्च रोजी पहाटे 4 वाजता गोरेगाव पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील बस स्टँडजवळ खेळणी विकणाऱ्या गुजराती कुटुंबातील दीड महिन्याचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. वनराई पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुलाचा कुठलाही मागमूस न लागल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली आणि अखेर तपासाला यश आले.
झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष पोलिस पथके तयार करण्यात आली. विविध दिशांनी तपास करताना पोलिसांनी ११ हजार ऑटो रिक्षांची तपासणी केली. तपासादरम्यान, पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक ऑटो रिक्षाचालक संशयाच्या जाळ्यात अडकला. घटनास्थळाजवळून मालाड मालवणीच्या दिशेने गेलेल्या एका ऑटो रिक्षाचा तपास केला असता, पोलिसांना मोठा धक्का बसला.
Kidnapping Case l बाळ चोरण्याचा कट कसा रचला गेला? :
तपासादरम्यान, आरोपी राजू मोरे याला दोन पत्नी असल्याचे समोर आले. त्याची पहिली पत्नी मंगल मोरे हिला मूल होत नव्हते, त्यामुळे ती मुल दत्तक घेण्याचा आग्रह धरत होती. मात्र, कायदेशीर दत्तक प्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार असल्याने राजूने मूल चोरण्याचा कट रचला.
राजूची दुसरी पत्नी फातिमा शेख हिने चोरी केलेल्या मुलासाठी ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आरोपी राजू मोरेने गुन्हा करण्यापूर्वी तीन दिवस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रेकी केली आणि कुटुंब झोपलेले असताना बाळ पळवून नेले.
मुंबई पोलिसांनी वेळीच तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या बाळाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.






