Sunetra Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, 31 जानेवारी रोजी त्या शपथ घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असून, त्यांच्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला जाणार आहे.
कोण आहेत सुनेत्रा पवार? :
राजकीय पार्श्वभूमी असूनही सुनेत्रा पवार यांनी अनेक वर्षे स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते. मात्र गेल्या काही काळात त्या सक्रिय राजकारणात उतरल्या असून, लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. आता थेट राज्याच्या सत्ताकेंद्रात उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताना त्यांचा प्रवास समाजसेवेतून राजकारणाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला दिसतो.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिव येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या कन्या असून, 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. विवाहानंतर दीर्घकाळ त्यांनी सार्वजनिक जीवनापासून अंतर राखले होते. मात्र अलीकडच्या वर्षांत त्या प्रचारात सक्रिय झाल्या आणि 2024 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती.
Sunetra Pawar | समाजसेवा, शिक्षण आणि पर्यावरणातील योगदान :
सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. त्या बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा असून, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात सक्रिय योगदान देत आहेत. 2010 मध्ये त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) या संस्थेची स्थापना करून सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काम सुरू केले. तसेच त्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणावर त्यांचा भर आहे. (Maharashtra Deputy CM)
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. हा निर्णय केवळ पवार घराण्याच्या राजकीय वारशाचा पुढचा टप्पा नसून, राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. समाजसेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचत असल्याने, आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.






