Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी, यासाठी आपण सर्वप्रथम त्यांचे नाव पुढे केले होते, असा दावा दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. राणेंच्या उमेदवारीची चर्चा सुरू केल्यानंतर आपल्याला धमक्या देण्यात आल्या आणि थेट मंत्रिपदावरून हटवण्याची भाषा करण्यात आली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
राणेंचे नाव पुढे करताच धमक्या :
एका कार्यक्रमात बोलताना केसरकर यांनी सांगितले की, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी सर्वात आधी आपणच केली होती. त्या वेळी राणे यांनी निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नव्हता. मात्र, त्यांच्याऐवजी स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही जणांना त्यांचा हा निर्णय खटकला. राणेंचे नाव पुढे केल्यापासून आपल्याला धमक्यांचे फोन आणि संदेश येऊ लागल्याचा दावा केसरकर यांनी केला.
आपण राणेंना उमेदवारी देण्याची मागणी केल्यामुळे मंत्री म्हणून पदावर राहता येणार नाही, अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या धमक्यांशी संबंधित व्हॉट्सॲप चॅटही आपल्याकडे होते, मात्र ते नंतर डिलीट झाले. त्यामुळे ते संदेश आता दाखवता येणार नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. राणेंचे नाव सुचवल्याने काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती, असेही त्यांच्या वक्तव्यावरून समोर आले.
Narayan Rane | राजकीय मतभेद मिटवून राणेंना साथ :
केसरकर यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबतही भाष्य केले. मंत्रीपद असो किंवा नसो, साईबाबांची कृपा आपल्यावर असल्याचे ते म्हणाले. आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला वारसा तसेच देवाची कृपा यामुळे आपले काम पुढे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्रीपदाच्या काळात व्यवसायाकडे आणि कुटुंबाकडे अपेक्षित लक्ष देता आले नाही. त्यामुळे आता त्या गोष्टींकडे लक्ष देण्याची वेळ आली असावी, असेही त्यांनी नमूद केले. सावंतवाडीची जनता हेच आपले कुटुंब असल्याचे सांगत, कार्यक्रमाच्या काळातही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला आपण पहिले प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.






