Maharashtra Politics | राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना काँग्रेस पक्षाला (Congress) एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे उद्या अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते आजच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. (Maharashtra Politics)
या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसेच बाजार समितीचे सभापती आणि संचालकांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भाजपात होणाऱ्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला मोठा झटका बसला आहे.
कुणाल पाटील भाजपाच्या वाटेवर, दोन दिवसांपूर्वीच दिले होते संकेत :
मागील दोन दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे, त्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता, त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत, कुणाल पाटील उद्या अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करणार आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, धुळे जिल्ह्यात कुणाल पाटील यांचा मोठा जनाधार आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे. काँग्रेससाठी हा धक्का निवडणूकपूर्व काळात अधिकच अडचणीत टाकणारा ठरणार आहे.
Maharashtra Politics | काँग्रेसमध्ये गळती वाढतेय, महाविकास आघाडी अडचणीत :
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केल्यानंतरही विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. याच पराभवानंतर आघाडीतील अनेक नेते भाजप व शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता काँग्रेसमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश ही त्या गळतीतील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात याचा थेट राजकीय परिणाम होणार आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






