Chhagan Bhujbal | अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
‘राज्यपालांना सांगून शपथविधी होईल’ :
काल सुनील तटकरे (sunil tatkare) आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
छगन भुजबळ म्हणाले, “सर्वसामान्य कार्यकर्ते आणि आमदारांचं मत विचारात घेतलं आहे. सुनेत्रा ताई (Sunetra pawar) यांना उपमुख्यमंत्री करणे अतिशय योग्य ठरेल, असं सर्वांचं मत आहे. त्यानुसार प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि आज दुपारीच ती पार पडेल. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली असून ते पूर्ण सहकार्य करत आहेत. कदाचित आजच राज्यपालांना सांगून शपथविधी होईल.”
Chhagan Bhujbal | ‘उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे देणं महत्त्वाचं’ :
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत आणि सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना माहिती दिली नाही, या मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. “या विषयावर मला काही बोलायचं नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
भुजबळ म्हणाले की, “आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आहे. ती सूत्रे योग्य पद्धतीने सुनेत्रा ताईंच्या हातात देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे काय करायचं, हे त्या ठरवतील.” या विधानामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट होत आहे.






