Chhagan Bhujbal | गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अखेर मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंगळवारी मुंबईतील राजभवनात झालेल्या एका साध्या पण महत्त्वाच्या सोहळ्यात त्यांनी शपथ घेतली. “मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ…” असं म्हणत त्यांनी मंत्रिपद स्वीकारलं. या शपथविधीनंतर आता त्यांना कोणतं खातं मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाल्याचं स्पष्ट दिसतंय. विशेष म्हणजे महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सुरुवातीला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ते खुलेआम नाराजी व्यक्त करत होते. मात्र आता, त्यांच्या सहभागामुळे महायुती सरकारमध्ये स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
फडणवीस-शिंदे-अजित पवार यांच्यासमोर घेतली शपथ :
या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर आता त्यांच्या खात्याबाबत चर्चांना गती मिळाली आहे. अजित पवार गटाचेच दुसरे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हेच खातं भुजबळ यांच्याकडे देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Chhagan Bhujbal Oth)
दरम्यान, भुजबळ यांचं मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर नाशिकमधील त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. शपथविधीपूर्वीच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. त्यांच्या या पुनरागमनामुळे नाशिक जिल्ह्यात महायुतीची ताकद अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.
Chhagan Bhujbal | मंत्रिपदाचा स्वीकार म्हणजे नाराजी संपली? :
छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि वजनदार नेता आहेत. त्यांच्या शपथविधीनंतर अनेक राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे की महायुती सरकारने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली आहे. भुजबळ यांना मंत्रिपद देऊन त्यांच्या समाजातील लोकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे या घडामोडींचा निवडणुकीवर कसा परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भुजबळ यांनी मंत्रिपद स्वीकारताना कोणतेही मोठे भाषण केले नाही. परंतु त्यांनी घेतलेली शपथ, उपस्थित नेत्यांची उपस्थिती आणि त्यांच्या समर्थकांचा उत्साह पाहता, ही नियुक्ती महत्त्वाची आहे. आता फक्त ते कोणत्या खात्याचे मंत्री होणार, याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.






