Chanakya Niti | मानवी स्वभाव, राजकारण आणि समाजरचनेवर भाष्य करणारे आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी आपल्या विचारांमधून स्त्री-पुरुषांच्या गुणवैशिष्ट्यांवरही भाष्य केले आहे. त्यांच्या नीतिशास्त्रात महिलांच्या काही गुणांचे विशेष उल्लेख आढळतात. एका श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या चार वैशिष्ट्यांबाबत ठळक निरीक्षण नोंदवले आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू शकते.
स्त्रियांचे चार गुण अधिक प्रभावी :
चाणक्यनीती (Chanakya Niti) मधील “स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोष्टगुण उच्यते॥” या श्लोकात स्त्रियांना चार बाबतीत पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्यवान म्हटले आहे. पहिला गुण म्हणजे आहार क्षमता. येथे केवळ अन्नग्रहणाचा संदर्भ नसून ऊर्जा, सहनशक्ती आणि जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद यांचा समावेश आहे. कुटुंब, मुले आणि सामाजिक भूमिका निभावताना महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक शक्तीची गरज असते, असे या विचारातून सूचित होते.
दुसरा गुण म्हणजे बुद्धिमत्ता. चाणक्यांच्या मते स्त्रियांची बुद्धी पुरुषांच्या तुलनेत चौपट असल्याचे वर्णन केले आहे. येथे शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर व्यवहारकुशलता, परिस्थितीचे अचूक आकलन आणि योग्य निर्णयक्षमता यांचा संदर्भ आहे. अनेकदा गुंतागुंतीच्या प्रसंगात शांतपणे मार्ग काढण्याची क्षमता महिलांमध्ये अधिक प्रभावीपणे दिसून येते, असे या श्लोकातून अधोरेखित होते.
Chanakya Niti | धैर्य आणि भावनिक तीव्रतेचा उल्लेख :
तिसरा गुण म्हणजे धैर्य. बाह्य शक्तीच्या दृष्टीने महिला कमी समजल्या जात असल्या तरी चाणक्य त्यांना साहसाच्या बाबतीत सहापट अधिक ठरवतात. कठीण प्रसंगात संयम राखणे, अपमान किंवा संकटाचा सामना करताना कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे, हे त्यांच्या धैर्याचे प्रतीक मानले गेले आहे.
चौथा मुद्दा लैंगिक इच्छेशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक गुंतवणूक, नात्यांतील जिव्हाळा आणि समर्पणाशी जोडला जातो. नातेसंबंधांमध्ये पूर्ण सहभाग आणि भावनिक खोली या बाबतीत स्त्रिया अधिक तीव्र असतात, असे या श्लोकात नमूद केले आहे. या सर्व निरीक्षणांद्वारे महिलांना दुर्बल समजणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले जाते.






