Maharashtra | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यासाठी दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यासोबतच स्थानिक विकासाला बळ मिळणार आहे, तसेच राज्यातील अनेक भागांचे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर सुधारेल.
महाराष्ट्रातील मंजूर झालेले रेल्वे प्रकल्प :
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, देशभरात एकूण चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी दोन प्रकल्प महाराष्ट्रासाठी आहेत. या प्रकल्पांवर अंदाजे 24,634 कोटी रुपये खर्च होईल, आणि आवश्यक ठिकाणी चार पदरी रेल्वे मार्ग, शक्य असल्यास सहा पदरी रेल्वे मार्ग तयार करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये वर्धा ते भुसावळ रेल्वे मार्ग आणि गोंदिया ते डोंगरगढ रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. वर्धा – भुसावळ मार्गावर तीन आणि चार लेनचे मल्टिट्रॅक रेल्वे काम होईल, ज्याचे अंतर सुमारे 314 किमी आहे. गोंदिया – डोंगरगढ मार्ग चार लेनचा रेल्वे ट्रॅक असून 84 किमी अंतराचा आहे. या मार्गामुळे संबंधित भागातील रहिवाशांना आणि उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार आहे.
खासदार अमर काळे यांनी केले निर्णयाचे स्वागत :
या निर्णयामुळे प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद होईल, तसेच मार्गावरच्या भागांचा आर्थिक आणि सामाजिक विकास गतीने होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमर काळे (Amar Kale) यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले, “रेल्वे मंत्र्यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. या प्रकल्पामुळे वर्धेकरांसह मार्गावरील प्रत्येक नागरिकाला फायदा होणार आहे. पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी माझी अपेक्षा आहे.”
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राला संपूर्ण देशात महत्त्वाची स्थानिक आणि आर्थिक जोडणी मिळाली आहे. राज्यातील रहिवासी, उद्योगधंदे, शहरी आणि ग्रामीण भाग यांना या निर्णयाचा दीर्घकालीन लाभ मिळणार आहे.






