Farmer News | महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातून 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यास मंजुरी दिली असून, या खरेदीचे एकूण मूल्य सुमारे 2696 कोटी रुपये इतके आहे. ही खरेदी किमान आधारभूत किमतीनुसार (MSP) होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळणार आहे. (Tur purchase Maharashtra)
गेल्या काही वर्षांपासून तुरीच्या दरात चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अनेक ठिकाणी बाजारभाव MSP पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे थेट सरकारी खरेदीचा मार्ग खुला झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
थेट खरेदीमुळे दलालांचा अडथळा संपणार :
ही खरेदी केंद्र सरकारच्या मूल्य समर्थन योजना (PSS) अंतर्गत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील मध्यस्थ, दलाल किंवा व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. थेट सरकारी संस्थांकडून खरेदी होणार असल्याने व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि शेतकऱ्यांना योग्य दर वेळेत मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Tur purchase Maharashtra)
या खरेदी प्रक्रियेसाठी नेफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या केंद्रीय संस्थांना राज्य सरकारच्या समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या तुरीची विक्री सहज करता यावी यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Farmer News | शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध :
या निर्णयावर बोलताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर तूर खरेदीमुळे केंद्र सरकारवर आर्थिक भार पडणार असला, तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. “शेतकऱ्यांच्या घामाला दाम देणे ही आमची जबाबदारी आहे आणि खरेदी प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही याची आम्ही खात्री देतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
या बैठकीला महाराष्ट्राचे विपणन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तुरीच्या खरेदी प्रक्रियेचे नियोजन, केंद्र-राज्य समन्वय आणि अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी गरज पडल्यास अतिरिक्त खरेदी केंद्र उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (MSP tur procurement)
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तूर उत्पादक पट्ट्यात या घोषणेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हमीभावावर थेट सरकारी खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येईल, तसेच पुढील हंगामासाठी पेरणीचा आत्मविश्वासही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादकांसाठी हा हंगाम दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे.






