Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्यभरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघातावेळी हवामान अनुकूल असतानाही विमान कसे कोसळले, याबाबत शंका व्यक्त केल्या जात असून या प्रकरणावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चौकशी अहवालातूनच सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हवामान स्पष्ट असतानाही अपघात कसा? :
अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी सांगितले की, अनेक नागरिक अपघाताच्या परिस्थितीवर प्रश्न विचारत आहेत. इतकं हवामान स्वच्छ असताना विमान अचानक कसे कलंडले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही तज्ज्ञांच्या मते, जर व्हिडिओ फुटेज स्पष्ट असेल, तर दृश्यमानतेचा मुद्दा फारसा लागू होत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे या अपघातामागील नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी महत्त्वाची ठरेल, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी यापूर्वी या घटनेबाबत शंका व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना देशमुख यांनीही संशय व्यक्त करत सांगितलं की, अपघाताच्या चौकशीला सुरुवात झाली असून त्यातूनच वस्तुस्थिती बाहेर येईल. विमानातील परिस्थिती, अपघातापूर्वी आणि अपघाताच्या क्षणी काय घडलं, हे चौकशी अहवालातून स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ajit Pawar | चौकशीतून सर्व बाबी समोर येतील :
अनिल देशमुख यांनी सांगितले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतर पायलट आणि को-पायलट यांच्यात झालेले संवाद उघड होतील. त्यातूनच विमान अपघातामागील नेमकी कारणे समजतील. त्यामुळे सध्या निष्कर्ष काढण्यापेक्षा चौकशी अहवालाची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्या दु:खद निधनामुळे सध्या दुखवट्याचा काळ असल्याने तात्काळ भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं सांगत त्यांनी दहा दिवसांनंतर सर्व घडामोडी सविस्तरपणे उघड करणार असल्याचं स्पष्ट केलं. कोणत्या तारखेला बैठक झाली, किती वेळ चर्चा झाली आणि नेमकं काय ठरलं, याची संपूर्ण माहिती दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar Death)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाबाबत अजित पवार यांनी स्वतःशी चर्चा केली नसल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याकडे लक्ष वेधण्यात आल्यावर देशमुख यांनी, “कोणाशी काय बोलणं झालं, कोण उपस्थित होतं आणि काय निर्णय झाले, हे सर्व तपशील मी सांगणार आहे,” असं ठामपणे नमूद केलं.






