Beed Railway Line | बीड जिल्ह्याच्या नागरिकांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजेच अमळनेर ते बीड (६७.७८ किमी) रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे बीड जिल्हा थेट अहिल्यानगरशी रेल्वेने जोडला जाणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Beed Railway Line)
१७ सप्टेंबरला उद्घाटन समारंभ :
या मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते १७ सप्टेंबरला होणार आहे. या वेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर काही दिवसांतच या मार्गावर डेमो रेल्वे सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Beed Ahilyanagar Railway)
या रेल्वेमार्गात प्रवाशांच्या सोयीसाठी जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी (नवगण) आणि बीड अशी नवी स्थानके विकसित करण्यात आली आहेत. बांधकामात १५ मोठे पूल, ९० छोटे पूल, १५ रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि ३१ रेल्वे अंडर ब्रिज (RUB) यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
Beed Railway Line | आर्थिक आणि सामाजिक फायदे :
या मार्गामुळे बीडमधील प्रवाशांना अहिल्यानगरसह थेट पुणे-मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे स्थानिक शेती, उद्योग आणि व्यापाराला आर्थिक चालना मिळेल. मालवाहतूक सुलभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. रेल्वे मार्गाशी संबंधित सेवांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. (Beed Railway Line)
या टप्प्याचे एकूण काम १,२८६ कोटी रुपयांत पूर्ण करण्यात आले आहे. अहिल्यानगर ते परळी वैजनाथ (Parali vaijanath) या एकूण २६१ किलोमीटर प्रकल्पाचा हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा (अहिल्यानगर–आष्टी) आधीच कार्यान्वित झाला आहे. आता तिसरा टप्पा म्हणजे बीड ते परळी वैजनाथ मार्गाचे कामही वेगाने सुरू असून लवकरच पूर्ण होण्याची योजना आहे.






