Ajit Pawar Last Tweet | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर अजित पवार यांचं शेवटचं ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मृत्यूच्या काही मिनिट आधी त्यांनी केलेली ही पोस्ट अनेकांना भावूक करत असून त्यांच्या विचारांची आठवण करून देत आहे. (Ajit Pawar Last Tweet)
बारामती येथे लँडिंग दरम्यान झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर राज्यभरात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातून संवेदनांच्या लाटा उसळताना दिसत आहेत.
काय होतं अजित पवारांचं शेवटचं ट्वीट? :
या दुर्घटनेच्या काही वेळ आधी अजित पवार (AJit Pawar News) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली होती. सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी महान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘पंजाब केसरी’ म्हणून ओळखले जाणारे लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले होते. “राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा सदैव प्रेरणा देत राहील,” असा मजकूर त्यांच्या पोस्टमध्ये होता.
ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर हजारो नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी “हीच त्यांची शेवटची सार्वजनिक भावना होती” अशा शब्दांत भावनाव्यक्ती केली आहे. समर्थकांसह सामान्य नागरिकांनाही हा क्षण अंतर्मुख करणारा ठरत आहे.
Ajit Pawar Last Tweet | समर्थक आणि नेत्यांच्या भावना अनावर :
दरम्यान, बारामतीतील रुग्णालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत असून अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत. अनेक ज्येष्ठ नेते रुग्णालयात दाखल होत असून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या दिल्लीतून तातडीने पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे. आमदार अमोल मिटकरी यांनाही अश्रू आवरले नाहीत आणि ते रडत रडत बारामतीकडे रवाना झाल्याचे दृश्य समोर आले आहे. (Ajit Pawar Last Tweet)
या अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या आठवणी आणि कार्य जनतेच्या मनात कायम राहतील, अशी भावना व्यक्त होत आहे.






