Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुर्घटनेनंतर आता अजित पवारांचे दीर्घकाळचे चालक श्यामराव मनवे यांनी आदल्या रात्री झालेल्या संवादाचा खुलासा केला असून, “अजितदादांनी ऐकलं असतं, तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
१९९९ पासून अजित पवारांसोबत काम करणारे ७१ वर्षीय श्यामराव मनवे यांनी सांगितले की, मुंबईतील बैठका संपल्यानंतर त्यांनी अजित पवारांना रात्रीच गाडीतून पुण्याला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र अजित पवारांनी विमानाने जाण्याचा निर्णय कायम ठेवला, आणि पुढे ही दुर्दैवी घटना घडली.
‘दादा माझे दैवत होते’ – चालकाची भावना :
श्यामराव मनवे यांनी अजित पवारांबद्दल बोलताना सांगितले की, “दादा माझे दैवत होते. माझ्या घरी गणपतीत जेवायला आले होते. शासनातून निवृत्त झाल्यानंतरही मी आजपर्यंत दादांसोबतच काम करत होतो. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील सर्वस्व गेल्यासारखे वाटत आहे.”
ते पुढे म्हणाले की, मंगळवारी रात्री त्यांनी अजित पवारांना वारंवार गाडीतून प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. मात्र दादांनी तो स्वीकारला नाही. “जर त्यांनी ऐकलं असतं, तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती,” असे ते अश्रूंनी सांगत होते.
Ajit Pawar | बारामती विमान दुर्घटनेचा तपास सुरू :
ही दुर्घटना बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ घडली असून, दिल्लीस्थित कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ विमानाचा यात समावेश होता. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती आणि केंद्र सरकारकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Ajit Pawar News)
विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे पथकही तपासासाठी पुण्यात दाखल झाले असून, लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे.






