Captain Sumit Kapoor | अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून, या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रांनी मोठा दावा केला आहे. अपघाताच्या दिवशी सुमित कपूर प्रत्यक्षात ड्युटीवर नव्हते, मात्र शेवटच्या क्षणी आदेश मिळाल्यामुळे त्यांनी ही फ्लाइट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताबाबत नव्या चर्चांना वेग आला आहे.
कॅप्टन सुमित कपूर हे अतिशय अनुभवी वैमानिक होते. त्यांना 16 हजारांहून अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता त्यांनी लिअरजेट 45 विमानाने उड्डाण केले होते. हे विमान अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला घेऊन जाण्यासाठी होते. मात्र, सकाळी 8.45 वाजता बारामती विमानतळाजवळ हा भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Captain Sumit Kapoor Death)
अपघाताच्या काही तास आधीच आदेश मिळाले :
सुमित कपूर यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या दिवशी मूळ पायलट वाहतुकीत अडकल्यामुळे उपलब्ध नव्हता. त्यामुळे काही तास आधीच सुमित कपूर यांना ही फ्लाइट घेण्याचे आदेश देण्यात आले. ते वरिष्ठ आणि विश्वासू कॅप्टन असल्यामुळे त्यांनी तत्काळ ही जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मित्रांनी स्पष्टपणे सांगितले की सुमित यांच्या चुकांमुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे.
अपघातानंतर मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर सुमित कपूर यांच्या हातातील ब्रेसलेटवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. ही बाब कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायक ठरली असून, दिल्लीतील पंजाबी बाग येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Captain Sumit Kapoor | अनुभवी वैमानिक, पण अचानक काळाने झडप घातली :
सुमित कपूर (Captain Sumit Kapoor) यांनी स्प्रिंगडेल्स आणि एअर फोर्स बाल भारती येथे शिक्षण घेतले होते. पुढे त्यांनी कॅनडामध्ये प्रगत उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले. 1990 च्या दशकात ते सहारा एअरलाइन्समध्ये रुजू झाले आणि त्यानंतर जेट एअरवेजमध्ये सेवा केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची बोईंग 737 परीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, जे नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील अत्यंत वरिष्ठ पद मानले जाते. (Ajit Pawar Plane Crash)
गेल्या पाच वर्षांपासून ते व्हीएसआर एव्हिएशनमध्ये कार्यरत होते आणि इतर वैमानिकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. काही दिवसांपूर्वीच ते हाँगकाँगहून परतले होते आणि कुटुंबासोबत वेळ घालवत होते. एप्रिलमध्ये ते 63 वर्षांचे होणार होते आणि दोन-तीन वर्षांत निवृत्ती घेऊन शांत आयुष्य जगण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, या भीषण दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.






