Ajit Pawar Plane Crash | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बारामतीमध्ये शोकाकूल वातावरण पाहायला मिळालं.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र पाठवत या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत, यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, असंही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं होतं. (Ajit Pawar Plane Crash)
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? :
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, अपघातासंदर्भातील सर्व तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल तपशील आणि घटनास्थळावरील तथ्यांची तपासणी केली जात आहे.
ही चौकशी पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण केली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चौकशी अहवालाच्या आधारे योग्य उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाहीही केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Ajit Pawar Plane Crash | चौकशी अहवालातून काय अपेक्षा? :
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणातील संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्र सरकारसह स्थानिक प्रशासनाचं सहकार्य या तपासासाठी महत्त्वाचं ठरणार असून, सर्व बाबींची बारकाईने छाननी करण्यात येत आहे.
या चौकशीच्या निष्कर्षांनंतर भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक बदल आणि उपाययोजना करण्यात येतील, असंही केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.






