Ajit Pawar Death | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला असून, राज्यभरातून नेते, कार्यकर्ते आणि नागरिक दाखल होत आहेत. ज्या मातीतून त्यांचा प्रवास सुरू झाला, त्याच मातीत त्यांचे पार्थिव विलीन होणार असल्याने वातावरण अत्यंत भावनिक झाले आहे.
गुरुवारी सकाळी अजित पवारांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. याठिकाणी काही काळासाठी अंत्यदर्शन ठेवण्यात आले असताना ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अजित पवार यांनी आयुष्याचा मोठा काळ याच काटेवाडी येथे घालवला असल्याने गावकऱ्यांशी त्यांचे घट्ट नाते होते.
पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांचा बांध फुटला :
काटेवाडी येथून अजित पवारांचे (Ajit Pawar) पार्थिव रुग्णवाहिकेत चढवताना उपस्थित ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला. “थांबा ना… आमच्या दादांना नका नेऊ… पाया पडतो तुमच्या,” अशा शब्दांत त्यांनी हुंदके देत विनवण्या केल्या. अनेक जण अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होते आणि वातावरण पूर्णपणे शोकमय झाले होते.
गावातील महिलाही अजितदादांना शेवटचा निरोप देताना भावुक झाल्या होत्या. “आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता, आम्ही बहिणी अजितदादांना सलाम करतो,” असे म्हणत त्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. या दृश्यांनी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
Ajit Pawar Death | विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार, जनसागर उसळला :
अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले असून, तेथे हजारो नागरिकांची गर्दी जमली आहे. राज्यातील अनेक बडे राजकीय नेते या अंत्यविधीसाठी बारामतीत दाखल झाले आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. (Ajit Pawar Death News)
अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, हा महाराष्ट्रावर नियतीने केलेला मोठा आघात असल्याची भावना जनमानसातून उमटत आहे.






