Ajit Pawar Death | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्व स्तरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते जीवन, मृत्यू आणि समाजासाठी केलेल्या कार्याबाबत बोलताना दिसत असून, त्यांच्या शब्दांमुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. हा व्हिडीओ भाजप नेते महेश लांडगे यांनी शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अजितदादांनी नेमकं काय म्हटलं? :
या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणतात की, हे जग कायमचं नाही आणि प्रत्येकाला नियतीचं बोलवणं आल्यानंतर जावंच लागतं. मात्र आयुष्य जगत असताना समाजासाठी काहीतरी देणं, विकासासाठी काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राजकारण हे सर्वस्व नसून, निवडणुका संपल्यानंतर पुन्हा समाजहितासाठी कामाला लागावं, असंही त्यांनी नमूद केलं.
View this post on Instagram
त्यांच्या या शब्दांतून त्यांच्या विचारांची प्रगल्भता आणि समाजाविषयीची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. आज त्यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ पाहताना अनेकांना त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण येत असून, तो अधिकच भावूक ठरत आहे.
Ajit Pawar Death | नेमकं काय घडलं त्या दिवशी? :
अजित पवार हे 28 जानेवारी रोजी सकाळी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर प्रशासन आणि सरकारकडून तातडीने चौकशी सुरू करण्यात आली असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. राज्यभरातून राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
प्राथमिक अहवालात काय निष्पन्न झालं? :
सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, विमान सकाळी 8.18 वाजता बारामती विमानतळाच्या संपर्कात आलं होतं. त्या वेळी हवामान स्वच्छ असून दृश्यमानता साधारण 3000 मीटर असल्याची माहिती वैमानिकांना देण्यात आली होती. पायलटने रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याचं सांगितलं, मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचं त्यांनी कळवलं.
यानंतर 8.43 वाजता धावपट्टी लँडिंगसाठी सज्ज करण्यात आली, मात्र त्यानंतर विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला धूर आणि ज्वाळा दिसू लागल्याची माहिती एटीसी अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






