Ajit Pawar Death | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे 8.45 वाजता हा अपघात झाला असून विमान लँडिंगपूर्वीच कोसळल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
अजित पवार हे मुंबईहून बारामती येथे चार नियोजित सभांसाठी येत होते. मात्र, विमानतळावर उतरण्याच्या काही क्षण आधीच तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामुळे राज्यभरात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
देशभरातून शोकसंवेदना :
अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अजित पवार यांना तळागाळातील जनतेशी घट्ट नाते असलेले जननेते म्हणून गौरवले असून त्यांच्या अकाली जाण्याने देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली आहे. (NCP Leader Ajit Pawar)
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. सर्व पक्षीय नेत्यांकडून अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
Ajit Pawar Death | राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम :
अजित पवार (Ajit Pawar Death) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व मानले जात होते. बारामती हा त्यांचा बालेकिल्ला असून अनेक दशकांपासून त्यांनी राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि विकासकामांमध्ये आघाडी घेतली होती.
त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक युवक राजकारणाकडे वळले होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. (Maharashtra Deputy CM Death)
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य पूर्ण करण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रातील जनतेमध्ये शोकाची लाट उसळली असून त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.






