Pune News | पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागने महत्वाची देखभाल आणि पाणीपुरवठ्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये कोथरूड, पौड रास्ता, शिवाजीनगर, औंध, पाषाण, बावधन यांसह पश्चिम पुण्यातील अनेक भागांचा समावेश आहे. महापालिकेने या कामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आधीच पाण्याची साठवण करण्याचे आणि आवश्यक ती सोय करण्याचे आवाहन केले आहे.
‘या’ भागांमध्ये राहणार पाणीपुरवठा बंद
महापालिकेच्या माहितीनुसार एसएनडीटी टाकी परिसरातील गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, संपूर्ण कोथरूड, शिवाजी हौसिंग सोसायटी, संगमवाडी, पोलीस लाईन, सेनापती बापट रस्ता, वैदुवाडी, लॉ कॉलेज रस्ता, पौड रस्ता, करिश्मा सोसायटी, मयूर कॉलनी, भारतनगर, नवसह्याद्री आणि गिरिजाशंकर भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. चांदणी चौक टाकी अंतर्गत पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल, मधुबन सोसायटी, बावधन, उजवी-डावी भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, डुक्करखिंड, शांतीबन, पूजा पार्क, लक्ष्मीनगर, सूस रस्ता आदी भागांनाही परिणाम होणार आहे.
तसेच, वारजे जलकेंद्र हद्दीतील काकडे सिटी, सिप्ला, पॉप्युलरनगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, महात्मा सोसायटी, मंत्री पार्क, एकलव्य कॉलेज परिसर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम, शाहू कॉलनी इत्यादी ठिकाणीदेखील उद्या पाणीपुरवठा थांबवण्यात येईल. याशिवाय बाणेर, बालेवाडी आणि पॅनकार्ड क्लब परिसरातील काही भागांनाही याचा परिणाम होणार आहे.
Pune News | शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु राहणार
महापालिकेने दिलेल्या सूचनेनुसार, पाणीपुरवठा दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (१० ऑक्टोबर) सकाळपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाणी वापर टाळावा आणि साठवलेल्या पाण्याचा वापर संयमाने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देखभाल कामांमध्ये मुख्य पाइपलाइन तपासणी, व्हॉल्व बदल, गळती दुरुस्ती आणि जलकेंद्रातील यंत्रसामग्री अद्ययावत करणे या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे भविष्यात अधिक कार्यक्षम पाणीपुरवठा होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या सूचनेनुसार, नागरिकांनी आपल्या परिसरातील जलकेंद्राच्या वेळापत्रकानुसार पाण्याची साठवण आधीच करावी आणि पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ पाणी वापरताना काळजी घ्यावी. तसेच पाणी धूसर किंवा गढूळ असल्यास ते उकळून वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.






