Bajrang Sonwane | अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यभरात शोककळा पसरलेली असतानाच या घटनेभोवती अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच खासदार बजरंग सोनवणे यांनी या दुर्घटनेबाबत धक्कादायक शंका उपस्थित केली आहे. विमानात बॉम्ब होता का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (Ajit Pawar plane crash)
सोनवणे म्हणाले की, अजितदादा माझे राजकीय वडील होते आणि माझ्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश आज दुःखात आहे. मात्र या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असून, त्यांचा खुलासा होणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपघातात अनेक प्रश्न अनुत्तरित :
बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी सांगितले की, विमानात सहा प्रवासी होते, मात्र पाच मृतदेह कसे सापडले, हा मोठा प्रश्न आहे. तसेच अजित पवार घरातून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. अपघात नेमका कसा झाला आणि विमान हवेतच का स्फोट झाला, याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. (Bajrang Sonwane statement)
या प्रकरणात अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पायलट कोण होता, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती, यासारख्या बाबी सार्वजनिक कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Bajrang Sonwane | स्मारक उभारण्याची घोषणा :
यावेळी बोलताना सोनवणे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला. 1999 पासून त्यांचा संपर्क होता आणि अजितदादा माझ्यासाठी राजकीय वडीलच होते, असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यात येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, एका वर्षात ते पूर्ण करून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
राजकारणावर भाष्य करण्याची ही वेळ नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर टिप्पणी टाळली. मात्र, अजितदादांनी जे स्वप्न पाहिले होते, ते अपूर्ण राहू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.






