Govardhan Asrani | हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनोदी भूमिकांसाठी विशेष ओळखले जाणारे असरानी यांनी अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आजारपणाशी झुंज अखेर संपली
मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचे २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजाराशी झुंज देत होते आणि गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. त्यांना आरोग्य निधी (Arogya Nidhi) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते आणि उपचारांना शरीर साथ देत नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. राजस्थानमधील जयपूरचे (Jaipur) रहिवासी असलेल्या असरानी यांच्या निधनाची बातमी त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा (Babubhai Thiba) यांनी दिली. बाबूभाई अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे सांभाळत होते.
Govardhan Asrani | ‘शोले’तील जेलर ते विनोदाचे बादशाह
जयपूरच्या सेंट झेवियर्स (St. Xavier’s) येथून शिक्षण घेतलेल्या असरानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६७ साली एका गुजराती चित्रपटातून केली. त्यानंतर ‘हरे कांच की चुडीयां’ (Hare Kanch Ki Choodiyan) या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९७३ साली आलेल्या ‘नमक हराम’ (Namak Haraam) मधील भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.
‘शोले’ (Sholay) चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ही त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. याव्यतिरिक्त त्यांनी ‘कोशिश’ (Koshish), ‘बावर्ची’ (Bawarchi), ‘परिचय’ (Parichay), ‘अभिमान’ (Abhimaan), ‘मेहबूबा’ (Mehbooba) अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. पुढे ‘जो जीता वही सिकंदर’ (Jo Jeeta Wohi Sikandar), ‘हेरा फेरी’ (Hera Pheri), ‘गरम मसाला’ (Garam Masala), ‘चुप चुप के’ (Chup Chup Ke), ‘भागम भाग’ (Bhagam Bhag) आणि ‘बोल बच्चन’ (Bol Bachchan) यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.






