IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने सलग दोन सामने गमावले असून, आता वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात त्यांना विजयी कामगिरी करून पुनरागमन करावं लागेल. मात्र, त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचा एक असा खेळाडू आहे जो नेहमीच मुंबईसाठी डेंजर ठरला आहे – व्यंकटेश अय्यर.
मुंबई इंडियन्स आणि KKR यांच्यात आजवर 34 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 23 सामने मुंबईने जिंकले आहेत. वानखेडेवरही मुंबईने 11 पैकी 9 सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या काही सामन्यांत KKRने वर्चस्व प्रस्थापित केलं असून, शेवटच्या 6 पैकी 5 सामने त्यांनी जिंकले आहेत. यामागे व्यंकटेश अय्यरचा मोठा वाटा आहे.
व्यंकटेश अय्यरचा मुंबईविरुद्ध चमत्कारिक परफॉर्मन्स :
KKR ने 2025 च्या लिलावात तब्बल 23.75 कोटी रुपये खर्च करून व्यंकटेश अय्यरला पुन्हा संघात कायम ठेवलं. त्यामागे एक ठोस कारण आहे – मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याचा अचूक परफॉर्मन्स. त्याने 6 इनिंग्समध्ये 362 धावा केल्या आहेत, आणि त्या देखील सरासरी 72 व स्ट्राईक रेट 362 सह.
त्याच्या या खेळींमध्ये 104(51) अशी एक शतक, तसेच 70(52), 53(30), 50(41), 43(24), 42(21) अशी सातत्याने फटकेबाजी आहे. विशेष म्हणजे त्याचा मुंबईविरुद्धचा निचांकी स्कोअरही 42 इतका आहे, ज्यातून त्याची स्थिरता आणि आत्मविश्वास दिसतो.
KKR l वानखेडेवर MI चं पारडं जड, पण… :
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा विजय टक्केवारीतून पाहिल्यास 61% इतकी मजबूत आहे. मात्र, 2021 नंतर ती टक्केवारी 57% वर आली आहे. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा होईलच, अशी खात्री देता येत नाही. विशेषतः जेव्हा समोर व्यंकटेश अय्यरसारखा ‘मुंबई स्पेशालिस्ट’ फलंदाज असेल.
मुंबईला सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीलाच अय्यरला बाद करणं गरजेचं आहे. अन्यथा त्याची एक चांगली खेळी सामन्याचं पारडं पूर्णपणे KKR च्या बाजूने झुकवू शकते, हे मागील आकडेवारीवरून स्पष्ट आहे.






