Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे शेतीसह दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Unseasonal Rain Alert)
पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज :
उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टरबन्सच्या परिणामामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department) राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या बदलामुळे काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते तसेच तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात अचानक बदल जाणवू शकतो.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 18 मार्चपासून विदर्भ आणि मराठवाडा भागात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 19 आणि 20 मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि खान्देशसह विदर्भात पावसाचा प्रभाव अधिक वाढू शकतो. या काळात वादळी वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert | गारपीट आणि वादळी वाऱ्याचा धोका :
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Unseasonal Rain Alert In Maharashtra)
विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत गारपीट होण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. कोकण तसेच मुंबई-पुणे परिसरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, मात्र तेथे पावसाची शक्यता तुलनेने कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.






