Maharashtra rain update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात थैमान माजवल आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. रात्रभर सुरू असलेल्या विजांच्या कडकडाटासह पावसाने ग्रामीण भागात आणि शहरातील जनजीवन विस्कळीत केले आहे.
पुण्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. तर मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काळोख पसरला आहे. तसेच ठाण्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाची शक्यता नोंदवली आहे. पावसाचं हे स्वरूप पाहून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra rain update)
जिल्ह्यांचे नुकसान, प्रशासन सतर्क :
बीड (Beed) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी शिरले, तर कळंब तालुक्यातील संजीतपुर गावाचा संपर्क तुटला. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे प्रेरणा नदीला पूर आला असून आजूबाजूच्या गावांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील धान्य पिकालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश काढत नागरिकांना आवश्यक नसल्यास बाहेर पडू नये, असे आवाहन केले.
Maharashtra rain update | पुढील 24 तास धोक्याचे :
सोलापूर (Solapur जिल्ह्यातील सीना नदी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून ७५ हजार ८१७ क्युसेक वेगाने सुरू आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात उळे-कासेगाव पूर पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. (weather Update)
दरम्यान, मुंबई उपनगरांमध्ये पावसाने अधून-मधून हजेरी लावल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-सीएसएमटी मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत, ज्याचा फटका कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसला आहे. रेल्वे प्रशासन वेळापत्रक सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. हवामान खात्याने पुढील 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे, अनावश्यक बाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






