Sanjay Raut l नाशिकमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत दर्गा हटाव मोहिमेवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवताना संजय राऊतांनी (sanjay raut) घणाघात केला आहे. ठाकरे गटाचं ‘निर्धार शिबिर’ नाशिकमध्ये सुरू असतानाच ही कारवाई करून मुद्दाम लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप त्यांनी केला.
“ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते आमच्या शिबिराला घाबरतात, म्हणून त्यांनी दर्ग्यावर आजच बुलडोझर चालवला”, असा आरोप करत राऊत म्हणाले की, “तुमच्यात हिंमत असेल, तर समोर या आणि लढा, आम्ही तयार आहोत.”
“हे सगळं जळणं आहे; शिवसेनेच्या सावलीचीही भीती वाटते” :
संजय राऊतांनी (sanjay raut) सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करताना म्हटले, “तुम्ही जळू आहात, तुम्हाला शिवसेनेचं अस्तित्व खुपतंय. त्यामुळेच फालतू उद्योग सुरू आहेत.” आजच दर्गा तोडण्याचा दिवस का निवडला? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते आज नाशिकमध्ये असून, पक्षाचं महत्त्वाचं शिबीर सुरू आहे. त्याच वेळी ही कारवाई करणं हे ‘राजकीय असुरक्षिततेचं’ लक्षण असल्याचे ते म्हणाले.
“ज्यांना देश फोडायचा आहे, त्यांच्याकडून धार्मिक स्थळं तोडली जात असतील, तर त्यात काही आश्चर्य नाही,” अशा शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. कारवाई आज न करता दुसऱ्या दिवशीही होऊ शकली असती, असा मुद्दाही त्यांनी मांडला.
Sanjay Raut l “सत्ता आमचा ऑक्सिजन नाही, आमचा उद्देश पक्ष बांधणी” :
राऊत म्हणाले, “सत्ता ही आमच्यासाठी ऑक्सिजन नाही. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत. आम्ही निवडणुकांच्या तयारीसाठी नव्हे, तर पक्ष आणि संघटना बांधणीसाठी शिबीर घेत आहोत. जनतेलाही आमच्यासोबत घ्यायचं आहे.”
“या राज्यात ज्याप्रकारे सत्ता परिवर्तन घडलं, त्यावर जनतेचा विश्वास नाही,” असं सांगून त्यांनी स्पष्ट केलं की, “हे अधिवेशन आमचं संकल्प अधिवेशन आहे, आणि त्यावर कुठल्याही कारवाईचा परिणाम होणार नाही.” उलट ते अधिक प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.






