IND vs PAK 2025 | दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक सामन्यात टीम इंडियाने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) केवळ खेळीनेच नव्हे तर सामन्यानंतरच्या भावनिक विधानानेही सर्व भारतीयांचे मन जिंकले. त्याने हा विजय थेट भारतीय सैन्याला समर्पित करत देशवासीयांचा अभिमान वाढवला.
पाकिस्तानचा निस्तेज खेळ, भारताची दमदार सुरुवात :
पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. ठरलेल्या २० षटकांत त्यांनी ९ गडी गमावून फक्त १२८ धावांची मजल मारली. साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० धावा तर शेवटच्या क्रमांकावर आलेल्या शाहीन आफ्रिदीने ३३ धावा काढल्या. (IND vs PAK 2025)
भारताच्या डावाची सुरुवात जबरदस्त झाली. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) शाहीनच्या पहिल्याच दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकून सामन्याचा सूरच ठरवला. त्याने १३ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिलने १० तर तिलक वर्माने ३१ धावांचे योगदान दिले.
IND vs PAK 2025 | सूर्याची विजयी खेळी आणि खास संदेश :
तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यात ५६ धावांची भागीदारी झाली. अखेरीस सूर्यानं ३७ चेंडूत नाबाद ४७ धावा ठोकल्या आणि षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला, “हा सामना आम्ही देशाच्या सैन्याला समर्पित करतो. आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांसोबत आहोत. हा विजय त्याग करणाऱ्या जवानांना वाहिला आहे.”
नाणेफेकीच्या वेळीच सूर्यानं पाकिस्तान कर्णधाराशी हस्तांदोलन टाळले. सामन्यानंतरही सूर्या आणि शिवम दुबे (Shivam Dubey) यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रूमकडे धाव घेतली. बाकी भारतीय खेळाडूंनी त्यांच्या स्वागताने जल्लोष केला. दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडू मैदानावरच हस्तांदोलनासाठी थांबले.
भारतीय गोलंदाजांची विजयी कामगिरी :
भारताच्या विजयात गोलंदाजांचाही सिंहाचा वाटा होता. कुलदीप यादवने ४ षटकांत फक्त १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. (IND vs PAK 2025)
अक्षर पटेलने २ तर बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १-१ बळी घेतला. पाकिस्तानच्या डावाची वाट लावण्यात फिरकी व जलदगती गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे ठरले.






