Nilesh Ghaiwal | पुण्यातील चर्चेत असलेले गुंड निलेश आणि सचिन घायवळ (Sachin Ghaiwal) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आता निलेश घायवळच्या मामांनीच आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यांनी रोहित पवार हेच या सर्व घडामोडींच्या मागे असल्याचा दावा केला आहे.
निलेश घायवळ विदेशात, मामांचा आरोप रोहित पवारांवर :
निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaiwal) हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील आहेत. त्यांचा गावात बंगला आणि शेती असून सध्या तो कुलूपबंद आहे. कुटुंब सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. निलेश विदेशात गेल्यानंतर अनेक स्तरांवर तपास आणि चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचे मामा जानकीराम अण्णा गायकवाड यांनी धक्कादायक वक्तव्य करत रोहित पवार यांच्यावर थेट आरोप केला आहे.
मामा गायकवाड म्हणाले की, “सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा राहणार होता आणि तो जिंकूनही आला असता. मात्र, त्याला अडवण्यासाठीच हे सगळं रचलं गेलं. रोहित पवारच या सगळ्या प्रकरणामागे आहेत.” त्यांनी पुढे दावा केला की निलेश आणि सचिन दोघेही ‘देवमाणूस’ असून त्यांच्यावर अन्याय होत आहे.
Nilesh Ghaiwal | रोहित पवारच करत आहेत सगळं; खरे करा, खोटे नको” मामांचे वक्तव्य :
जानकीराम गायकवाड यांनी पुढे सांगितले की, “रोहित पवारच सर्व काही करत आहेत. जे काही करायचं ते खरे करा, खोटे नको. निलेश घायवळला अमरावती जेलमधून बाहेर काढण्यासाठीही रोहित पवारांनीच (Rohit Pawar) प्रयत्न केले होते. सचिन घायवळ निवडणुकीत उतरणार असल्याने त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला.”
सचिन आणि निलेश दोघांचेही शिक्षण पुण्यात झाले असून त्यांचे वडील नोकरीला असल्याने संपूर्ण कुटुंब पुण्यातच स्थायिक आहे. सचिन घायवळवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला शस्त्र परवाना देण्यात आला नव्हता. गृहखात्याकडून आलेल्या आदेशांनुसार योग्य ती कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनीही या प्रकरणात भूमिका मांडताना सांगितले की, सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी कोणतीही शिफारस नव्हती. गृह राज्यमंत्र्यांकडून फक्त परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश होते, परवाना देण्याचे नव्हते. दरम्यान, निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.






