Sharad Pawar | राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतराची मालिका वेगाने सुरू झाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण (Dilip Chavan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीसमोर विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली गळती अजूनही थांबलेली नाही. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटालाही गळतीचा फटका बसत आहे. दिलीप चव्हाण (Dilip Chavan) यांच्या राजीनाम्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला असून, त्याचबरोबर अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर बळ मिळणार आहे.
राष्ट्रवादीत फुट कायम; अजित पवार गटाचा वाढता प्रभाव :
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये कार्यकर्त्यांसाठी चढाओढ सुरू आहे. अजित पवार गट सातत्याने नवे नेते आपल्या गटात सामील करून घेत आहे. दिलीप चव्हाण यांच्या प्रवेशामुळे हिंगोलीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे, असे राजकीय सूत्रांनी सांगितले.
चव्हाण यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांच्याकडे सोपवला आहे. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने शरद पवार गटासाठी ही मोठी धक्कादायक घडामोड मानली जात आहे. स्थानिक स्तरावर त्यांच्या समर्थकांची संख्याही लक्षणीय असल्याने हा बदल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.
Sharad Pawar | निवडणुकीआधी गळतीचं आव्हान; महाविकास आघाडीसमोर डोकं दुखी :
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने जोरदार पुनरागमन केलं असून महाविकास आघाडीला गळतीचं संकट भेडसावत आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते महायुतीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि ठाकरे गटासमोर गळती रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, पुढील काही दिवसांत आणखी काही नेते गटबदल करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.






