Sharad Pawar | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) आज मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आलं की, आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना उमेदवारी दिली जाणार आहे. यासह शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना युवकांना मोठ्या प्रमाणावर पुढे आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
तरुणांना संधी देण्याचा पवारांचा निर्णय :
या बैठकीत पवार म्हणाले, “आपल्याकडे इच्छुकांची आणि काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ज्या तरुणांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मुलांना आणि मुलींना संधी द्या. स्थानिक पातळीवर नव्या पिढीला संधी देणं ही आपली जबाबदारी आहे.”
यासोबतच पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, “आगामी आठवड्यात स्थानिक आघाड्यांबाबत निर्णय घ्या आणि महाविकास आघाडीशी समन्वय साधा.”
Sharad Pawar | जातीय सलोखा आणि संयम राखा — पवारांचा सल्ला :
बैठकीत बोलताना पवारांनी अलीकडे वाढलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत पवार म्हणाले, “पूर्वी आपल्यासोबत असलेले काही आमदार आता जातीय तणाव निर्माण करतील अशी विधानं करत आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही जाती-धर्मावर आधारित राजकारणाची नाही. बोलताना प्रेमाची भाषा वापरा आणि जातीय सलोखा टिकवा.”
ते पुढे म्हणाले, “लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा धर्मनिरपेक्षतेची भावना अधिक महत्त्वाची आहे. सरकारने लोकांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या गोष्टींवर गप्प बसू नये.”
महाविकास आघाडीची बैठक उद्या :
शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटलं, “राज्य सरकारकडून दिली जाणारी मदत तुटपुंजी आहे. केंद्राने पाहणी करून योग्य मदत द्यावी. आमच्या काळात केंद्रीय पथक येऊन प्रत्यक्ष स्थिती पाहत असे आणि तत्काळ मदत जाहीर करत असे.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारे आघाडी घ्यायची, याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही पवारांनी दिली. पुढील काही दिवसांत जिल्हानिहाय रणनीती आखली जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.






