Shaktipeeth Expressway | महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर रद्द करण्यात आलेला नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा नव्या जोमाने राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित होणारा हा प्रकल्प आता अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यात येत असून, त्याच्या अलाइनमेंटमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. (Shaktipeeth Expressway)
शक्तीपीठ महामार्ग हा केवळ नागपूर आणि गोवा जोडणारा रस्ता नसून, तो राज्यातील जवळपास 30 हून अधिक जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कनेक्टिव्हिटी देणारा महत्त्वाचा द्रुतगती महामार्ग ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकल्पाला मंजुरी देत सुधारित संरेखन अंतिम केले आहे. यामुळे महामार्गाची लांबी आणि व्याप्ती दोन्ही वाढल्या आहेत.
शक्तीपीठ महामार्गाची लांबी वाढली :
प्रारंभी प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाची लांबी सुमारे 801 किलोमीटर इतकी असणार होती. मात्र नव्या अलाइनमेंटनुसार या महामार्गाची लांबी आता तब्बल 840 किलोमीटरपर्यंत वाढली आहे. सुरुवातीला हा महामार्ग 11 जिल्ह्यांतून जाणार होता, परंतु आता सातारा जिल्ह्याचा समावेश झाल्याने हा प्रकल्प 13 जिल्ह्यांना जोडणार आहे.
सातारा (Satara) जिल्ह्याचा समावेश हा नव्या आराखड्याचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या बदलामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग अधिक व्यावहारिक आणि प्रवासी-केंद्रित करण्यात आल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे.
Shaktipeeth Expressway | जनकल्याण महामार्गाशी थेट जोडणी :
नव्या अलाइनमेंटची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग आणि कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग एकमेकांना थेट जोडले जाणार आहेत. सरकारने तयार केलेल्या नव्या आराखड्यानुसार लातूर जिल्ह्यातील मुरूड (बार्शी रोड) येथे इंटरचेंज मार्गिकेद्वारे या दोन महामार्गांची जोडणी केली जाणार आहे. (Kalyan Latur Expressway)
या जोडणीमुळे नागपूरहून गोवा अतिजलद गाठता येणार असून, त्याचवेळी जनकल्याण महामार्गाच्या माध्यमातून मुंबई, जेएनपीए बंदर, वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळाकडे जाणे अधिक सोपे होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांसाठी ही जोडणी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
442 किमीचा टप्पा एमएसआरडीसी विकसित करणार :
कल्याण-लातूर-हैदराबाद द्रुतगती महामार्गाचा कल्याण ते लातूर सुमारे 442 किमीचा टप्पा एमएसआरडीसी विकसित करणार आहे. हा महामार्ग सेवेत आल्यानंतर लातूर ते कल्याण हे अंतर अवघ्या चार ते साडेचार तासांत पूर्ण करता येणार आहे. बदलापूरपासून सुरू होणारा हा महामार्ग औराद शहाजनी (निलंगा तालुका) येथे संपेल आणि पुढे हैदराबादपर्यंत वाढवण्यात येणार आहे. (Shaktipeeth Expressway)
शक्तीपीठ आणि जनकल्याण महामार्गाच्या या महत्त्वपूर्ण जोडणीमुळे लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






