Satyacha Morcha Mumbai | महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आजचा दिवस अत्यंत गाजणार आहे. कारण आज विरोधकांचा बहुचर्चित ‘सत्याचा मोर्चा’ मुंबईत निघणार असून, या मोर्चाद्वारे निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला जाणार आहे. मतदार याद्यांतील घोळ, बोगस मतदार आणि मतचोरीच्या आरोपांवरुन विरोधक एकवटले आहेत. दुपारी १ वाजता मुंबई CSMT येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे.
या मोर्चासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली असून, CSMT परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरातून विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत असून, वातावरण घोषणाबाजीने दणाणून गेलं आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व डावे पक्ष सहभागी होणार आहेत.
मतचोरी विरोधात एकवटले विरोधक, ‘सत्याचा मोर्चा’ला सर्वपक्षीय पाठिंबा :
शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे, काँग्रेस तसेच डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ‘खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा!’ अशा घोषणा देत विरोधकांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांवर थेट कारवाईची मागणी केली आहे.
मोर्चाचा मुख्य उद्देश म्हणजे मतदार याद्यांतील फेरफार, बोगस मतदार आणि मतचोरीविरुद्ध आवाज उठवणं हा आहे. विरोधकांच्या मते, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देशाच्या राजकारणात नवे समीकरण तयार करू शकते. या पार्श्वभूमीवर ‘सत्याचा मोर्चा’ला केवळ राज्यस्तरीयच नव्हे तर राष्ट्रीय राजकीय पातळीवरही महत्त्व लाभत आहे.
Satyacha Morcha Mumbai | मोर्चासाठी जय्यत तयारी, पावसाचे सावट आणि ठाकरेंकडून मार्गदर्शन :
मुंबईत सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असली तरी विरोधकांचा जोश काही कमी झालेला नाही. ठिकठिकाणी झेंडे, बॅनर्स आणि घोषणा फलकांमुळे संपूर्ण मुंबई मोर्चाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. विरोधकांच्या या सत्याच्या लढाईसाठी मोठी गर्दी जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंच्या सेनेकडून मोर्चासाठी काल रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. “मोर्चाला येताना शक्यतो मुंबई लोकलचा वापर करा,” असे आदेश देण्यात आले आहेत. विरोधी पक्षांच्या बॅनर्स आणि झेंड्यांनी मुंबईतील प्रमुख चौक सजवले गेले आहेत.
लोकशाहीच्या बचावासाठी ‘सत्याचा मोर्चा’ – विरोधकांचा इशारा :
विरोधकांनी जाहीर केलं आहे की, “हा मोर्चा लोकशाहीच्या बचावासाठी आहे.” निवडणूक आयोगाने मतदार याद्यांवरील आक्षेप गांभीर्याने न घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे या मोर्चातून निवडणूक आयोगावर थेट दबाव आणण्याचा प्रयत्न दिसून येतोय.
मुंबईतील या मोर्चामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, पोलिसांकडून पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली आहे. नागरिकांना गरज असल्याशिवाय CSMT परिसरात जाणं टाळण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.






