Sanjay Raut | पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस-मच्छी विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, अशी परिस्थिती असताना आता महानगरपालिकेने १५ ऑगस्टला मांस-मच्छी विक्रीवर बंदी आणल्याचा फतवा काढल्याबद्दल राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मांसाहार बंदीवरुन संजय राऊत भडकले
संजय राऊत यांनी स्वातंत्र्यदिन हा शौर्याचा दिवस असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, हा दिवस धार्मिक उत्सव नाही, तर देशाच्या स्वातंत्र्याचा आणि विजयाचा दिवस आहे. हे स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले नाही, तर त्यासाठी मोठा रक्तपात आणि हिंसाचार झाला आहे. स्वातंत्र्यलढ्यात सध्याचे मांस-मच्छी न खाण्याचे धोरण असलेले भाजपचे लोक कुठेच नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली.
राऊत यांनी प्रश्न विचारला की, “तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का?” ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले असताना त्यांचे मावळे फक्त वरण-भात खाऊन लढत नव्हते, तर ते मांसाहार करत होते. त्याचप्रमाणे बाजीराव पेशवे हे देखील मांसाहार करत होते, कारण युद्धावर लढण्यासाठी मांसाहाराची आवश्यकता असते. सीमेवर लढणाऱ्या सैन्यालाही मांसाहार करावा लागतो. त्यामुळे, फक्त वरण, भात, तूप आणि श्रीखंड-पुरी खाऊन युद्ध लढता येत नाही, असे म्हणत राऊत यांनी या निर्णयाचा जोरदार निषेध केला.
त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज्य करण्याचे हे ‘नवीन थोतांड’ असून, त्याचे जनक कोण आहेत, असा सवाल केला. फडणवीस यांनी हे काँग्रेसच्या काळातील निर्णय असल्याचे म्हटले असता, राऊत यांनी ‘तुम्ही स्वतःचे बोला, तुमच्या छातीवर काँग्रेस बसली आहे,’ असा टोला लगावला.
“हा देश बंदीराष्ट्र झाला आहे का?”
या संदर्भात शरद पवार यांच्या काळातही असा निर्णय झाला होता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राऊत म्हणाले की, “शरद पवार मुख्यमंत्रीपदी राहून किती काळ लोटला हे फडणवीस यांना माहिती आहे का?” हा दावा ‘थोतांड’ असल्याचे सांगत त्यांनी शरद पवारांच्या काळात असा कोणताही अध्यादेश निघाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुन्हा एकदा या फतव्यावर टीका करत, ‘हा देश बंदीराष्ट्र झाला आहे का?’ असा सवाल उपस्थित करत, फडणवीस यांनी हे फतवे मागे घ्यावेत अशी मागणी केली.






