Rohit Arya Encounter | पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेलं ओलीस नाट्य अजूनही चर्चेत आहे. ३० ऑक्टोबर रोजी रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने १९ जणांना ओलीस ठेवलं होतं. शिक्षण विभागाकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं होतं. अखेर पोलिस कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. (Rohit Arya Encounter)
या घटनेदरम्यान आर्याने माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (dipak kesarkar) यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. पोलिसांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र केसरकर यांनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी का नकार दिला, याबद्दल आता स्वतः केसरकरांनीच मोठा खुलासा केला आहे.
केसरकरांचा खुलासा — “मी मंत्री नसल्याने काही देऊ शकत नव्हतो आश्वासन” :
दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर मौन तोडत म्हटलं, “मी सध्या मंत्री नाही, त्यामुळे रोहित आर्याला कोणतंही ठोस आश्वासन देऊ शकत नव्हतो. त्या क्षणी मुलं ओलीस असताना, त्याला खात्री देणं अत्यावश्यक होतं. म्हणून मी पोलिसांना सांगितलं की त्याने संबंधित शिक्षणमंत्री किंवा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशीच संपर्क साधावा.”
तसंच, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेवरचं रहस्य काहीसं दूर झालं आहे. मात्र आता त्यांचा जबाब औपचारिकपणे नोंदवला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Rohit Arya Encounter | पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही धक्कादायक तपशील समोर :
दरम्यान, रोहित आर्याच्या (Rohit Arya Encounter) मृत्यूनंतर जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, रोहित आर्याचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाला आहे. त्या जखमेच्या स्वरूपावरून त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असा निष्कर्ष वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आला आहे.
या अहवालानंतर एन्काऊंटरची सत्यता आणि पोलिसांची कारवाई यावर नव्याने चर्चा रंगली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, केसरकरांचा जबाबही महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील काही दिवसांत तपासात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.






