RBI Bank | देशभरात बँक विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच बँकिंग क्षेत्रात एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुजरातमधील चार प्रमुख सहकारी बँकांच्या विलीनीकरणाला अंतिम मान्यता दिली आहे. ही अधिसूचना 15 डिसेंबर 2025 पासून लागू झाली असून, या निर्णयामुळे सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (RBI Bank Merger)
RBI ने स्पष्ट केले आहे की, हे विलीनीकरण बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत करण्यात आले असून, संबंधित बँकांच्या परस्पर संमतीने म्हणजेच स्वेच्छेने हे विलीनीकरण करण्यात आले आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश सहकारी बँकांची आर्थिक स्थिरता वाढवणे आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा आहे.
कोणत्या बँका कोणात विलीन झाल्या? :
पहिल्या विलीनीकरणात अहमदाबाद येथील द आमोद नागरीक सहकारी बँक ही द भुज मर्कंटाईल सहकारी बँक मध्ये विलीन करण्यात आली आहे. या विलीनीकरणानंतर आमोद नागरीक सहकारी बँकेच्या सर्व शाखा आता भुज मर्कंटाईल सहकारी बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत. हे विलीनीकरण बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 44A अंतर्गत करण्यात आले आहे.
दुसऱ्या महत्त्वाच्या विलीनीकरणात अमरनाथ सहकारी बँक ही कालूपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विलीन करण्यात आली आहे. या निर्णयानंतर अमरनाथ सहकारी बँकेच्या सर्व शाखा आता कालूपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांमध्ये रूपांतरित होतील आणि सर्व बँकिंग व्यवहार एकाच छत्राखाली पार पडतील.
RBI Bank | खातेदारांच्या ठेवींवर काय परिणाम होणार? :
या विलीनीकरणाबाबत सर्वात मोठा दिलासा RBI ने खातेदारांना दिला आहे. RBI ने स्पष्टपणे सांगितले आहे की या विलीनीकरणामुळे ग्राहकांच्या ठेवींवर कोणताही परिणाम होणार नाही. खातेदारांच्या सर्व ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून, बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच अखंडितपणे सुरू राहणार आहेत. (Cooperative Bank Merger)
तज्ज्ञांच्या मते, या विलीनीकरणामुळे सहकारी बँकांची आर्थिक क्षमता वाढेल, तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील आणि ग्राहकांना आधुनिक व सुरक्षित बँकिंग सेवा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही घाबरट प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






