Ravindra Dhangekar | पुण्यातील गुन्हेगारीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangrkar) यांनी थेट चंद्रकांत पाटलांना (Chandrkant Patil) लक्ष्य करत समीर पाटील या व्यक्तीबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. धंगेकरांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “दादांच्या आजूबाजूला असलेले काही लोक कोथरुड परिसरातील गुन्हेगारीला चालना देत आहेत. पुणे भयमुक्त व्हावं हा माझा उद्देश असून, गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांचा खुलासा झाला पाहिजे.”
पुण्यातील गुन्हेगारी आणि धंगेकरांचा सवाल :
रवींद्र धंगेकर म्हणाले, “मी गेली ३०-४० वर्षं सामाजिक जीवनात काम करतोय. पुणेकरांमध्ये वारंवार फिरावं लागतं. पुण्यावर संकट असेल, सर्वसामान्यांना जगणं कठीण होत असेल, तर ती आपली सर्वांची जबाबदारी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) प्रकरणात जे दोषी आहेत, जे त्याला सपोर्ट करतात, त्यांच्यामुळेच कोथरुड परिसरात गुन्हेगारी वाढतेय. मी फक्त एवढाच प्रश्न विचारला की, निलेश घायवळ टोळीचे (Nilesh Ghaiwal Gang) लोक दादांच्या आजूबाजूला आहेत का? त्याचा खुलासा त्यांनी करावा.”
धंगेकरांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “पासपोर्टमध्ये फेरफार झाला, पोलिसांना इंटरपोलकडे मदतीसाठी विनंती करावी लागली. वर्षानुवर्षे गुन्हेगार मोकाट फिरत होते. त्यामुळे पुणे पोलिसांची (Pune Police) नाचक्की झाली. या सगळ्याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ravindra Dhangekar | समीर पाटील कोण?; धंगेकरांचा थेट हल्ला :
धंगेकर म्हणाले, “माझा प्रश्न चंद्रकांतदादांना होता, कारण त्या भागात तेच मंत्री आहेत. पण माझ्या वक्तव्यावरून समीर पाटील नावाची व्यक्ती पुढे आली. ती म्हणाली, मी १०० कोटींचा मालक आहे, मी धंगेकरांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार. हा माणूस पुणेकरांना चॅलेंज देत होता.” धंगेकर पुढे म्हणाले, “मी समीर पाटीलला पाहिलं नव्हतं, म्हणून शोधायला गेलो. तो म्हणाला माझ्यावर एकही केस नाही. पण मी सांगलीला गेलो आणि मला पेपर मिळाले. सांगलीत त्याच्यावर मोकामध्ये कारवाई झाली आहे, चीटिंगचे गुन्हे दाखल आहेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या व्यक्तीचा गुन्हेगारी व्यवहारात हस्तक्षेप आहे.”
धंगेकरांनी शेवटी स्पष्ट भूमिका घेतली, “मी शिवसेनेचा महानगर प्रमुख आहे, पण त्यापेक्षा आधी मी पुणेकर आहे. जर पुण्यात गुन्हेगारी वाढत असेल, तर त्यावर बोलणं हे माझं कर्तव्य आहे. कोणाचंही नाव असो, पण पुणे भयमुक्त व्हायला हवं.” त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलं की, “गुन्हेगारांच्या पाठीशी कोणी उभं राहिलं, तर त्याचा खुलासा झाला पाहिजे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी बोलणं म्हणजे राजकारण नाही, ती सामाजिक जबाबदारी आहे.”
या सगळ्या वक्तव्यांमुळे आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. धंगेकरांच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) आणि समीर पाटील यांचा काय प्रतिसाद येतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.






