“आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा?”; मालवण घटनेने राज ठाकरेंचा संताप

On: August 27, 2024 8:25 AM
Raj Thackeray furious over Chhatrapati Shivaji Maharaj statue Collapsed
---Advertisement---

Raj Thackeray | महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे इतके निकृष्ट काम कसे केले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)देखील संतापले आहेत.

अवघ्या आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने विरोधकांनीही महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा हा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय.

राज ठाकरे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांची पोस्ट-

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती?, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.

याचबरोबर त्यांनी कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता देखील ट्वीटरवर पोस्ट केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोस्ट केलेली कविता-

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!

पुढे राज ठाकरे यांनी लिहिलं की,”पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.”

News Title –  Raj Thackeray furious over Chhatrapati Shivaji Maharaj statue Collapsed

महत्त्वाच्या बातम्या-

आज दहीहंडीचा सण, श्रीकृष्णाची कृपा कुणावर असणार?; वाचा आजचे राशीभविष्य

वसंत मोरेंना ठाकरे गटाकडून मिळणार आमदारकीचं तिकीट? ‘या’ मतदारसंघात लढणार

कर्मचाऱ्यांनो महाराष्ट्रात नवीन पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार? जाणून घ्या

राजकीय उलथापालथ! महायुतीचे 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

सप्टेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या यादी

Join WhatsApp Group

Join Now